|
प्रा. कुरुंदकरांच्या लिखाणाची औपचारिक सुरवात १९५३ साली प्रतिष्ठान या मराठवाडा साहित्य परिषदेच्या मुखपत्रात समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध होऊन झाली. त्यावेळी ते केवळ २१ वर्षाचे होते. त्यानंतर मराठवाडा दिवाळी अंकात शरदचंद्र चटर्जी यांच्या शेषप्रश्न या पुस्तकावर त्यांनी एक लेख लिहिला. पुढे नवभारत, सत्यकथा अशा प्रस्थापित मासिकांमध्ये विविध विषयावर लेख प्रकशित होऊ लागले. रिचर्डसची कला मीमांसा हे पहिले पुस्तक १९६२ साली प्रकाशित झाले. देशमुख आणि कंपनी च्या रा. ज. देशमुख यांच्या आग्रहाखातर प्रा. कुरुंदकर यांनी एक २०० पानांचा समीक्षणात्मक लेखसंग्रह करून द्यायचे कबुल केले. तो पुढे रूपवेध या नावाने प्रसिद्ध झाला. या नंतरही प्रा. कुरुंदकर यांचे अनेक लेखसंग्रह प्रकाशित झाले. लेखसंग्रहाबद्दल एका पत्रात प्रा. कुरुंदकर लिहितात, "लेख सुटे सुटे प्रकाशित होतात. त्या त्या वेळी पार्श्वभूमीसह संपूर्ण विषय मांडावा लागतो. अशा वेळी संग्रह केला की ग्रंथभर पुनरुक्ती होत राहते". ही पुनरुक्ती टाळणे हे लेखकाचे कर्तव्य आहे असे ते मानत. मधल्या काळात झालेल्या अभ्यासाने मतांमध्ये ही बदल होतो. "जे माझे मत चूक आहे, हे मला पटले व मी त्या मताचा त्याग केला", अशी त्यागलेली मते/ विचार लेख संग्रहात प्रकाशित करण्याची प्रा. कुरुंदकर यांची तयारी नव्हती. ग्रंथ रूपाने लेख संग्रह प्रकाशित करताना ते मोठ्या प्रमाणात फेर लिखाण करून, जेथे शक्य असेल तेथे पुनरुक्ती टाळून, चुका सुधारून घेत असत. आपल्या पुस्तकाबद्दल एका पत्रात ते लिहितात, " माझ्या विवेचनाचे महत्व कदाचित कुणाला वाटणार नाही. माझी स्तुती होईल, विवेचनाची उपेक्षा होईल, मग माझ्या विवेचनाचे महत्व समजणारे वाचक निर्माण होईतो थांबणे भाग आहे." ते पुढे लिहितात, "पण, माझी इच्छा कठोर टीका होऊन सर्वांनी मला मुर्खात काढावे ही आहे. कारण त्यासाठी माझ्यापेक्षा खोलात उतरावे लागून मराठी समीक्षा अधिक सखोल करावी लागेल व तेच मला हवे आहे." (Click on the name of the book to read more)
|